Advertisement
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीची प्रथा चर्चेत आली होती. त्यामुळे मराठा समाजाने आता बैठकीत ठराव मंजूर केला असून, विवाहासंदर्भात आचारसंहिता स्विकारली आहे. मराठा समाजाच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत विवाहसोहळ्यांच्या स्वरूपात अमूलाग्र बदल करण्याचे ठरवण्यात आले. तसंच विवाहबद्दलची आचारसंहिता आणि नियमावाल स्वीकारण्यात आली.
वैष्णवीच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबाला लग्नात 51 तोळं सोनं, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. यानंतरही दोन कोटींच्या जमिनीसाठी तिचा छळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा एकदा मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली असून, यावेळी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सामूहिक विवाह, मर्यादित खर्च, डीजे-फटाक्यांना बंदी असे निर्णय यावेळी घेण्यात आले.
बैठकीत अनावश्यक खर्च, डीजे, फटाके आणि प्री-वेडिंग शूटसारख्या दिखाऊ गोष्टींना विरोध दर्शवण्यात आला. विवाहखर्च कमी करणे, दोन्ही कुटुंबांनी तो सामायिक करणे, आणि विवाहसंस्कार हे केवळ कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी म्हणून पार पाडणे, असे ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीस उपस्थित असलेल्या तरुण, तरुणी आणि पालकांनीही या निर्णयांचे स्वागत करत, सामाजिक परिवर्तनाची नांदी असल्याचं म्हटलं आहे.
याआधीही मराठा समाजाची बैठक पार पडली होती. मराठा समाज यापुढे कोणताही रोटी बेटी व्यवहार करणार नाही, असा ठराव पुण्यातील मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसंच अनेक समाजहिताचे निर्णय घेण्यात आले होते. लग्न करताना काही तरी आचारसंहिता असावी असं मत मांडण्यात आलं होतं.
