#

Advertisement

Friday, July 18, 2025, July 18, 2025 WIB
Last Updated 2025-07-18T17:34:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

जालना आणि नागपूर जिल्ह्यांतील ८० हजार लाडक्या बहि‍णींचे अर्ज रद्द

Advertisement

मुंबई : राज्य सरकारने गेल्यावर्षी १८ जून २०२४ रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना आधार देण्यासाठी मासिक आर्थिक मदत देईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार दर महिन्याला पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये ही रक्कम जमा होते. मात्र आता एकापाठोपाठ एक राज्यातील लाडक्या बहि‍णींना धक्के बसत आहेत. राज्य सरकारने आता ८० हजाराहून अधिक लाडक्या बहि‍णींचे अर्ज रद्द केले आहेत.
राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी सरकारकडून निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या आयकर विभागाकडून छाननी केली जात आहे. महाराष्ट्रातील जालना आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांतील लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का बसला आहे. आयकर विभागाच्या छाननीनंतर विविध कारणांमुळे हजारो अर्ज अपात्र ठरले आहेत. ज्यामुळे अनेक महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे.

जालना जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद
जालना जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी एकूण ५ लाख ४२ हजार ३९२ अर्ज दाखल झाले होते. मात्र, आयकर विभागाकडून सुरू असलेल्या पडताळणीमध्ये जवळपास ५७ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात सरकारी नोकरदार सदस्य असणे, चारचाकी वाहन असणे, विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असतानाही ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करणे, यांसारख्या विविध कारणांमुळे हे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत.

नागपूर जिल्ह्यात ३० हजार अर्ज अपात्र
नागपूर जिल्ह्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला फटका बसला आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १० लाख ७३ हजार महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी साधारण ३० हजार लाडक्या बहिणींचे अर्ज प्राथमिक पडताळणीत बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यात कार असलेल्या महिला, आयकर भरणारे कुटुंबिय असलेल्या महिला आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिलांच्या अर्जांचा समावेश आहे. हे सर्व अर्ज प्रामुख्याने अपात्र ठरले आहेत.