Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंबातील चुलत बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. 5 जुलै 2025 रोजी मुंबईत एक संयुक्त मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी आहे, ज्याला ‘मराठी विजय दिवस’ म्हणून संबोधले जात आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यावर अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया दिलीय. या मेळाव्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंनाही निमंत्रण दिल्याचे ते म्हणाले.
उद्याचा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातला टर्नींग पॉईंट ठरावा.मुंबई महापालिकेवर आता बाजारी ब्रॅन्ड नाही; ठाकरी विचार दिसेल. ठाकरे हा ब्रॅन्ड नाही तर ठाकरे हा विचार आहे. ठाकरे विचार उद्या दिसणार आहे. ब्रॅन्ड बाजारी असतो; विचार आतुन येतो, असे बाळा नांदगावकर म्हणाले. महापालिका निवडणूकीत यावेळी नक्कीच वेगळं घडेल; मराठी माणूस ठाकरेंच्या विचारांचा विचार करेल. 2 बंधुंमध्ये एकमेकांप्रती विश्वास द्रुढ होतोय. बाळासाहेबांना दोन ठाकरे बंधुंना व्यासपिठावर एकत्र बघुन आनंदच झाला असता. बाळासाहेब असते तर कुणी मराठीबाबत असा निर्णय घेण्याची हिंमतच झाली नसती; अशी वेळच बाळासाहेबांनी येऊ दिली नसती, असे नांदगावकर म्हणाले.
