Advertisement
मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) च्या नवीन आठवीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकातील एका नकाशाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे, ज्यावर जैसलमेरच्या माजी राजघराण्यातील सदस्य चैतन्यराज सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे या त्रुटी तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाने राजस्थानातील राजघराण्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र नाराजी पसरवली आहे.
NCERT ने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट (NCF-SE) यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन पाठ्यपुस्तके प्रकाशित केली आहेत. यामध्ये विशेषतः सातवी आणि आठवीच्या इतिहास आणि सामाजिक शास्त्र विषयांच्या पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नवीन आठवीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात, ‘Exploring Society: India and Beyond – Grade 8, Part 1’ या पुस्तकात मराठा साम्राज्यावरील एक स्वतंत्र प्रकरण समाविष्ट आहे. यापूर्वी सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मराठ्यांबाबत केवळ दीड पानांचा उल्लेख होता, तो आता 22 पानांपर्यंत विस्तारण्यात आला आहे. या प्रकरणात शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या योगदानापर्यंत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तकातील युनिट 3, पृष्ठ क्रमांक 71 वर असलेल्या एका नकाशाने वादाला तोंड फोडले आहे. या नकाशात मराठा साम्राज्याचा विस्तार कोल्हापूरपासून कटक आणि उत्तरेकडील पेशावरपर्यंत दाखवण्यात आला आहे. यामध्ये जैसलमेर, मेवाड, बूंदी, जयपूर, पंजाब आणि राजस्थानातील इतर अनेक भाग मराठा साम्राज्याचा भाग म्हणून दर्शवले गेले आहेत. या नकाशाला जैसलमेरच्या माजी राजघराण्यासह राजस्थानातील इतर राजघराण्यांनी आणि राजकीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.