Advertisement
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी चाकणमध्ये पहाणी दौऱ्यात एक मोठी घोषणा केली आहे. पुणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये तीन महानगरपालिका केल्या जाणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं आहे. अजित पवारांनी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्येबरोबरच नागरी समस्यांची पाहणी केली.
स्थानिकांशी चर्चा करताना, चाकणमध्ये नगरपरिषद असून यामुळे विकासावर मर्यादा येत आहेत. अशाच प्रकारची बंधनं हिंजवडीमधील औद्योगिक क्षेत्रातही येत आहेत. म्हणूनच चाकण आणि हिंजवडीला नवीन महापालिका तयार केल्या जाणार आहेत. या दोन शहरांबरोबरच उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका केली जाणार आहेत. चाकणसहीत या तीनही ठिकाणच्या महापालिका कोणाला आवडो न आवडो या सर्व महापालिका होणारच असा विश्वास अजित पवारांनी बोलून दाखवला आहे. अजित पवारांकडून मागील काही आठवड्यांमध्ये वारंवार या भागांची पहाणी सुरु आहे. याच पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांनी आज नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
अजित पवारांनी सांगतिले की, आज मी चाकणची वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने दौरा केला. सकाळी 5:45 वाजता मी आलो. नॅशनल हायवे, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी, पालिकेचे आयुक्त या सर्वांना मी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करणार आहे. त्यासाठी निधी ही देतोय. त्यानंतर पुणे-नाशिक हा एलीवेटेड मार्ग करुयात. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही खूप त्रास सहन केलाय, तुम्ही सहनशीलता दाखवली पण आता यातून सुटका करूया.