Advertisement
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीचं निकाल जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुंबईत काँग्रेस 24 जागा जिंकून तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे.परंतु, काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर पक्षातूनच टीकेची झोड उठवण्यात आली आहे. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. या निकालांचे पडसाद आता राजकीय पटलावर उमटू लागले आहेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जगतापांनी गायकवाडांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई होती.मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानेपराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहेत. काँग्रेस हायकमांड आता मुंबई काँग्रेसमधील या वादात हस्तक्षेप करणार का? वर्षा गायकवाड आपल्या पदाचा राजीनामा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
