Advertisement
10 कोटींची खंडणी मागितली
मुंबई : बॉलिवूड कलाकारांनंतर बिष्णोई गँगनं आपला मोर्चा आता राजकारण्याकडे वळवला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील आमदारांनी फोन करून खंडणीसाठी त्यांना धमकावलं जात असल्याचं तपासात समोर आले आहे. बिष्णोई गँगकडून अकोल्यातील 2 आमदारांना धमकावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यात काँग्रेसचे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना शुभम लोणकर यांच्या नावानं धमकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. तसेच, पूर्ण पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. आमदार खान यांनी ही बाब जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळवली आहे आणि कॉल रेकॉर्डिंग सादर केले आहे. तर दुसरीकडे अकोलातील अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांचा निकटवर्तीय हरीश टावरी यालाही बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आल्याची चर्चा आहे. त्यांनाही फोनवरील व्यक्तीनं बिष्णोई गँगकडून शुभम लोणकर बोलत असल्याचं सांगत 2 कोटींची धमकी दिली आहे. या दोन्ही प्रकरणाची दखल मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतली आहे.
