Advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणी राज्य सरकारविरोधात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. नागपुरातून 'राम रक्षा' आंदोलनाला सुरुवात होणार आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्लाही आहे. यामुळे उद्धव ठाकरे थेट त्यांनाच आव्हान देत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन उद्धव ठाकरेंना रामरक्षाची दोन पानं वाचावी असा टोला लगावला आहे. तसंच मीदेखील त्यांची तयारी असेल तर सोबत रामरक्षा म्हणण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
"रामरक्षाची दोन पानं त्यांनी वाचावी अशी अपेक्षा आहे. रामाच्या नावाखाली राजकीय आंदोलन कऱणं योग्य नाही. मागच्या वेळीही ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मीदेखील त्यांची तयारी असेल तर सोबत रामरक्षा म्हणण्यास तयार आहे. मला संपूर्ण रामरक्षा येते. समजा येत नसली तरी किमान वाचता तरी आलं पाहिजे. आंदोलन करता आणि वाचता येत नाही हे कोणतं आंदोलन आहे?," असा टोला त्यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे हताश, निराश व्यक्ती आहेत. त्यांचं राजकारणात अस्तित्व राहिलेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
18 जुलैपासून शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे रामरक्षा पठण
खासदार संजय राऊत यांनी रामनगरातील राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना फोन करून 18 जुलै च्या रामरक्षा पठणसाठी सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे रामनगर राम मंदिर ट्रस्ट कडूनही रामरक्षा पठणाला विरोध नाही मात्र राजकीय विचार मांडायचे असल्यास मंदिर परिसराच्या बाहेर जाऊन ते मांडावे व आंदोलन करावे असा सूचनाही करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंदिराचे सदस्य आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे रामरक्षा पठणाचे स्थान कोणते हे उद्या संजय राऊत शहरातील तीन विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राम मंदिराच्या शेजारीच असलेल्या एनआयटीच्या पटांगणावर भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन 22 तारखेला केले आहे.
