Advertisement
भाजपने सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना निर्णय घेण्यासाठी दिली मुदत
दिल्ली : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अद्याप याबाबत एकाही गटाने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा आपली जाहीर भूमिका मांडलेली नाही. अशातच आता राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भाजपने सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना निर्णय घेण्यासाठी मुदत दिल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे अशी भाजपच भूमिका आहे. राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भाजप उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसब चर्चा करत आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटासोबत जवळीक वाढवण्याचे देखील प्रयत्न सुरु आहेत.
राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी भाजप आग्रही असली तरी राष्ट्रवादी विलिनीकरणास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांचा विरोध असल्याची देखील चर्चा आहे. प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे,छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री, आमदार मात्र विलीनीकरणाच्या बाजूने असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत विलिनीकरणा संदर्भात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा आग्रह आहे. सुनेत्रा पवार,पार्थ पवार यांना लवकर निर्णय घेण्यासाठी मुदत दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या अकाली एक्झिटनं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्र कोण हाती घेणार? हा मोठा प्रश्न आहे, अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर पक्ष आणि चिन्ह त्यांना देण्यात आलं होतं, त्यामुळे तेच या पक्षाचे सर्वेसर्वा होते, तर दुसरीकडे शरद पवारांकडे त्यांच्या राष्ट्रवादी एसपीची धुरा आहे. त्यामुळे दादांच्या जाण्यानं राष्ट्रवादीची सूत्र कोणच्या हाती जाणार? कारण पक्षनेतृत्वाचा अनुभव दादांच्या कुटुंबात कोणाकडेही नसल्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना तोंड फुटल आहे.
