Advertisement
मुंबई : गद्दार आमदारांची आपल्याला कीव येते, असे आदित्य ठाकरे विधानभवनात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसे उभे केले आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागते. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी राजीनामा देऊन थेट निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले कि, 40 लोकांनी राजीनामा द्यावा, मीही देईन. आपण निवडणूका लढवू. मी तर म्हणतो की विधानसभा बरखास्त करा, संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका लावा. होऊन जाऊ दे एकदाचं, असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले. ज्याची भिती वाटते, त्याच्यावर टीका जास्त केली जाते. पायऱ्यांवर उभे असणाऱ्यांची कीव येते. त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदांची. ती मिळाली नाही, म्हणून त्यांना श्रेष्ठींना खुश करण्यासाठी माझ्याविरोधात बोलायला लागत आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
