Advertisement
मुंबई : पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्रालयासमोर एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला होता. या शेतकऱ्याला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र आज उपचारादरम्यान, या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मंत्रालयासमोरच एका शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. आज 29 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर सागर गुंडेवाल यांनी त्यांना 11:55 वा. मयत घोषित केले.
