Advertisement
मुंबई : 'शिवसेनेनं आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. राजकारणामध्ये धोका सहन करू नका. जे राजकारणात धोका देत असतात त्यांचं राजकारण यशस्वी होत नसतं. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे' असं म्हणत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ही बैठक मुंबई महानगर पालिका संदर्भात होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा सहभाग होता. यावेळी अमित शहा यांनी भाजपच्या नेत्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शहा यांनी भाषण करत असताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 2014 च्या निवडणुकीच्या वेळी फक्त दोन जागांसाठी शिवसेनेनं युती तोडली होती. सेनेनं आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला. मुंबईच्या राजकारणामध्ये भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे, शिवसेना त्यांच्या राजकारणामुळे छोटी झाली असून त्यांची वाईट अवस्था झाली आहे, अशी टीकाही अमित शहांनी केली. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलं, की पूर्ण देशाला माहिती आहे की चाणक्य कोण आहे? आता मुंबई महानगरपालिका निवडणूक अशी लढा की जणू ही शेवटची निवडणूक आहे. काहीही करून मुंबई पालिकेवर भाजपाचा महापौर बसलाच पाहिजे.