Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अजित पवारांना तब्बल तीन तास थांबायला लागले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी न पोहोचल्यामुळे अजित पवार नाराज होऊन निघून गेल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाची बैठक लांबल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यक्रमाला वेळेत पोहोचू शकले नाहीत.
मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री आणि विरोधी पक्षनेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होणार होती. मंत्रिमंडळ बैठक 11 वाजता सुरू झाली होती. या कार्यक्रमासाठी अजित पवार 12 वाजता मंत्रालयात पोहोचले, पण मंत्रिमंडळ बैठक लांबल्यामुळे दादांना माहिती-जनसंपर्क सचिवांच्या कार्यालयात जाऊन बसले. बराच वेळ झाल्यानंतरही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री न आल्यामुळे कंटाळून अजित पवार निघून गेले. अधिकाऱ्यांसमोर अजित पवारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. अजित पवार या संघटनेचे अध्यक्ष आहेत. अजित पवार निघून गेल्यानंतर या कार्यक्रमाला सुरूवात झाली.
