Advertisement
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेना आमदारांवर सडकून टीका केली. एवढच नाही तर प्रत्येक आमदाराला 50 खोके मिळाल्याचा आरोपही ठाकरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही 50 खोके एकदम ओके, अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांवरून शिंदेंकडे गेलेले शिवसेना नेते रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. मातोश्रीवर किती खोके जातात, याची माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे.
'गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी मतदारसंघात पाय ठेवून दाखवा, असं आव्हान त्यांनी केलं, पण सगळे आमदार आले. जनतेने त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांनी माझ्या वरळी मतदारसंघातून जाऊन दाखवा म्हणून सांगितलं, त्यांच्या नाकावर टिच्चून सगळे आमदार वरळी मतदारसंघातून गेले. मग सांगितलं विधानभवनात पाय ठेवून दाखवा. सगळे आमदार विधानभवनात पोहोचले. ते बोलतात फक्त, दुसरं काय योगदान आहे. काही जमलं नाही आता खोके म्हणतात. मातोश्रीमध्ये किती मिठाईचे खोके गेले ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका', असा खळबळजनक आरोप रामदास कदम यांनी केला.
