Advertisement
बारामती : केंद्र सरकार आमचे वैरी नाहीत आमच्यात केवळ वैचारिक मतभेद आहेत. जल जीवन मिशनमध्ये केंद्राचा पन्नास टक्के वाटा आहे त्याबद्दल त्यांचे आभार. पण उरलेला पन्नास टक्के वाटा हा महाविकास आघाडी सरकारचा आहे त्या चेकवर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांची सही आहे. हे मान्य करावं लागेल, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान महाविकास आघाडी काळात झालेल्या कामांचे श्रेय आताच्या सरकारने घेऊ नये असाच सुप्रीय सुळेंचा रोख होता.
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज (दि. 22) एक दिवस इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असून सुळे यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील 72 कोटी 33 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी ‘माझा मतदार संघ, माझा अभिमान’ या अभियानातंर्गत संवाद साधला.
राष्ट्रवादीचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मतदार संघातील कामांच्या आढावा घेतला. तसेच केंद्र सरकार आणि राज्याच्या समन्वयाबाबतही त्यांनी चर्चा केली. खासदार सुळे म्हणाल्या कि, महाविकास आघाडीत दत्तात्रय भरणे हे मंत्री होते. त्यांचा अर्धा वेळ मुंबईत तर अर्धा वेळ इंदापूरात त्यातून दोन तीन दिवस मंत्रालय तर दोन तीन दिवस सोलापूरमध्ये जायचा. मात्र मी जेव्हा विकासकामांचा आढावा घेते तेव्हा विचार करते की मामा एक सुपरमॅन होते. महाविकास आघाडी काळात दत्तात्रय भरणे यांनी सर्वच जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली असल्याने त्यांचा डेटा जनतेने तपासून पहावा.
