Advertisement
पुणे : मी घराण्याचा वारसदार म्हणून बोलत नाही तर तुमच्यासारखा एक सामान्य छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून बोलत आहे. इतिहासाचं विकृतीकरण चालू आहे. मात्र सर्व जण गप्प आहेत. शिवरायांबद्दल काही जण चुकीचे बोलतात. मात्र लक्षात ठेवा लोकशाही ही संकल्पना शिवरायांचीच होती. कधीकधी असा विचार येतो की हे सर्व पहाण्यापेक्षा मी मेलो का नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेमधून राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. बोलताना उदयनराजे भावुक झाल्याचंही पहायला मिळालं. आता जनतेनं विचार कारायला हवा. आपण इतिहासाचं विकृतीकरण करणं कधी थांबवणार आहोत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच महापुरुषांचा अपमान हा देशद्रोहाचा गुन्हा का होऊ नये असेही त्यांनी यावेळी म्हटलं.
शिवरायांबद्दल अनेक जण चुकीचं बोलतात. विविध चित्रपटात चुकीचं चित्रिकरण केलं जातं. आता याचा जनतेनंच विचार करायला हवा. विकृतीकरण थांबायला हवं. महापुरुषांची बदनामी हा देशद्रोहाचा गुन्हा का ठरू नये? नव्या पिढी पुढे आपण कोणता विचार मांडणार आहोत असा सवाल उदयनराजे यांनी केला आहे.
