Advertisement
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी हे 7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले. राहुल गांधींच्या यात्रेचा महाराष्ट्रातला मुक्काम 14 दिवस होता, पण आता हा मुक्काम वाढला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातला समारोप जळगाव जामोदमध्ये होणार होता, मात्र, आता भारत जोडो यात्रेचा मुक्काम 2 दिवस वाढला आहे.
दरम्यान, या भारत जोडो यात्रेसंदर्भात भाजप नेते नितेश राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारत जोडो यात्रेतील कलाकार पैसे देऊन आणले, असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेत जे कलाकार दिसतात त्यांना पैसे देऊन आणले आहे, असे एका एजन्सीला पाठवलेल्या मेसेजवरून स्पष्ट होतंय. मध्य प्रदेशमध्ये कुठला कलाकार चालू शकतो, यासाठी पैसे द्यायला आम्ही तयार आहोत असा संदेश भारत जोडो यात्रेच्या टीमकडून काही एजन्सीला पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे. ही जी नौटंकी आणि जे कलाकार राहुल गांधीसोबत 15-15 मिनिटे चालत आहेत ते पैसे देऊन आणलेत का? असा प्रश्न विचारला जातोय, असेही ते म्हणाले. दरम्यान, आता भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या या आरोपनंतर काँग्रेस काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
