Advertisement
मुंबई : अब्दुल सत्तार यांच्या सुप्रिया सुळेंबाबत वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे कान टोचले. अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले. त्यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांना फोन करुन माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी जाहिररीत्या माफी मागितली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांनी दोन दिवसांमध्ये आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. आमदार आणि प्रवक्त्यांनी भविष्यात अशी वक्तव्य करू नयेत, तसंच बोलताना काळजी घ्यावी, असा सज्जड दम या बैठकीत दिला जाण्याची शक्यता आहे. आमदार आणि प्रवक्त्यांनी लगेच कोणत्याही मुद्द्यावर बोलू नये, असे आदेशही एकनाथ शिंदेंकडून आमदार आणि प्रवक्त्यांना दिले जाण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनंही केली आणि सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाद वाढल्यानंतर अखेर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली.
