Advertisement
पंढरपूर : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनातून कलाविश्व सावरत असतानाच आणखी एका हरहुन्नरी चेहऱ्याला काळानं हिरावल्याची माहिती समोर आली आहे. पंढरपूरमध्ये झालेल्या एका भीषण अपघातात ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावर रोपळे गावानजीक उजनी कालव्याच्या अरुंद पुलावरून काल रात्री एक फॉर्च्युनर गाडी नियंत्रण सुटल्याने थेट पन्नास फूट कालव्यात पडली. या अपघातात मोडनिंममधील लावणी कलावंत मीना देशमुख ( वय 60) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अफघातामध्ये तिघं गंभीर जखमी झाले असून, मीना देशमुख यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातातून देशमुख यांची मुलगी, नात आणि चालक बचावले असले तरी ते गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातानंतर कालव्यात उतरण्यास रस्ताच नसल्याने बराच वेळ अपघातग्रस्तांना मदत मिळाली नाही.
रस्त्यांची अपूर्ण कामं...
सदर रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहे. अरुंद पुलामुळे या परिसरात अनेकदा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार आणखी किती बळींची वाट पाहणार आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
