Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह पुन्हा एकदा 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला जाऊन कामख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत आमदार बच्चू कडू हे देखील गुवाहाटीला जाणार आहेत. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व आमदार जात आहेत, मी पण जाणार आहे. आम्ही सर्वांनी मिळून कामख्या देवीला नवस केला होता म्हणून सरकार आलं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते. दरम्यान सरकार पडल तरी चालेल मात्र शेतकरी अडचणीत आला नाही पाहिजे, दिव्यांग शेतकरी यांचं कल्याण झालं पाहिजे असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं आहे.
शिंदे, फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही, सरकार पडेल असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप रंगताना दिसत आहेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावरून बच्चू कडू यांनी त्यांना टोला लगावला आहे. हे सगळ मूर्ख बनवण्याचं काम आहे. आम्ही पण असंच म्हणत होतो सरकार पडलं पाहिजे. या सगळ्या भूलथापा आहेत. आमदार फूटू नये यासाठी संजय राऊत यांच्याकडून अशी वक्तव्य करण्यात येत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
