Advertisement
छत्तीसगड : नवा रायपूर येथे काँग्रेसच्या 85व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सोनिया गांधी यांनी पक्षाचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यादरम्यान त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
पक्षाध्यक्ष म्हणून आपल्या खेळीचा उल्लेख करताना म्हणाल्या की, 1998 साली मी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. 25 वर्षात पक्षाने अनेक मोठे यश संपादन केले आणि निराशाही झाली. त्या पुढे म्हणाल्या की, 2004 आणि 2009 मधील आमच्या विजयांसोबत मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले. मात्र, माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या अध्यक्षपदाचा समारोप 'भारत जोडो यात्रे'ने झाला. 'भारत जोडो यात्रे'साठी त्यांनी राहुल गांधींचे आभार मानले. काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून देशाच्या एकात्मतेची धुरा आहे. आपण देशाच्या प्रश्नांसाठी लढतोय. आता आपण जनतेचा आवाज होण्याची वेळ आली आहे. धर्म, जात, भाषेची पर्वा न करता आपल्या सर्वांचा आवाज बना. त्यामुळे आपला विजय निश्चित होईल. राहुल यांच्या समर्पण आणि निष्ठेमुळे भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. त्यांच्या यशाचे श्रेयही यात्रेत सहभागी असलेल्या सर्व नेते व कार्यकर्त्यांना जाते. सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, 'दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि महिलांवर अत्याचार होत आहेत. प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे. संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचला आहे. पुढे आणखी कठीण काळ असेल.
