Advertisement
मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिलीय. आता औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव असं असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे ट्विट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभारही मानले. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’ असंही फडणवीस म्हणाले.
केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते की महाराष्ट्राच्या उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यास मंजुरी दिली. मात्र औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याला मंजुरी देण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले होते की, महाराष्ट्र सरकारकडून दोन्ही शहरांची नावे बदलण्यासंदर्भात काही प्रस्ताव दिला आहे का? दिला असल्यास तो प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला आहे का?
औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामाकरणाचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळातही घेण्यात आला होता. त्यानतंर राज्यात पुन्हा नवं सरकार आल्यानतंर नाव बदलण्यात आले. याबाबत १६ जुलै २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता.
