Advertisement
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. केजरीवाल-ठाकरे भेटीमुळे महाराष्ट्रात नवीन राजकीय समिकरणं तयार होऊ शकतात का? याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केल्यानंतर आता अरविंद केजरीवालही मातोश्रीवर आल्यामुळे या चर्चांना वाव मिळाला आहे. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला.
'कोरोना काळात आपण सगळं शिकत होतो, त्याकाळात उद्धव ठाकरेंनी जे कार्य केलं ते आदर्श घेण्याजोगं आहे. मुंबईत जसा कंट्रोल केला जायचा, तसा उपक्रम आम्ही नियंत्रणासाठी दिल्लीत राबवायचो. ठाकरेंसोबतच्या बैठकीत आम्ही बेरोजगारी, महागाई आणि देशातल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली,' असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
काही ठराविक लोकांसाठी सरकार गोष्टी गहाण ठेवत आहे. एकमेकांशी लढायचं नाही, तर एकत्रित राहायचं आहे. उद्धव ठाकरेंना भेटलो, चांगलं वाटतंय. ही मैत्री आणखी घट्ट होईल, अशी आशा आहे,' असं सूचक विधान अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत आप-ठाकरे गटाची युती होणार का? असा प्रश्न विचारला असता, 24 तास निवडणुकीचा विचार करणारा देशभरात एकच पक्ष आहे, आम्ही त्यावर चर्चा केली नाही, असं केजरीवाल म्हणाले.
