Advertisement
नागपूर : सत्यजीत तांबेंच्या बंडावरून आक्रमक झालेल्या बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून राजीनामा पाठवला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणं शक्य नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या पत्रात स्पष्ट केलं आहे. बाळासाहेब थोरात यांच्या या भूमिकेला काँग्रेसमधल्या काही नेत्यांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. काँग्रेस नेते सुनील केदार यांनीही बाळासाहेब थोरात यांची बाजू घेत नाना पटोले यांना सबुरीचा सल्ला दिला.
काँग्रेसमधल्या या वादावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका मांडली आहे. बाळासाहेब थोरात आमचे नेते आहेत, हेच आम्ही सांगतो. 10 तारखेच्या बैठकीत चर्चा होईल, असं नाना पटोले म्हणाले. 15 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या सगळ्या गोष्टीचे हिशोब तिथेच दिला जाईल. अखिल भारतीय काँग्रेसकडून अनेक कार्यक्रम दिलेले आहेत, त्याचा आढावा या बैठकीत घेणार आहोत. तसंच दोन नवनियुक्त आमदारांचा सत्कार होईल. आगामी निवडणुका जिंकण्याची रणनीती बैठकीत ठरवू,' असं नाना पटोले यांनी सांगितलं.
