Advertisement
| भोसरी : मराठी मातीची ओल माणसांना जगण्याचे बळ प्राप्त करून देते. ऊन, वारा,
पाऊस यांच्याशी संघर्ष करून आपले अस्तित्व आणि अस्मिता जपण्याची वीरश्री मराठी
माणसाच्या मनात मातीची ओल निर्माण करून देते. अक्षर वाड:मयातून ऊर्जा मिळाल्याने
जगण्याला नवे बळ प्राप्त होते, रणजीत देसाई, पु.ल.देशपांडे, इंदिरा संत, शांता
शेळके यांच्या साहित्याला डावलून आपण पुढे जाऊ शकत नाही. या साहित्याने जगण्याची
जाणीव निर्माण करून दिली. साहित्यिकांचा वसा आणि वारसा हेच मराठी भाषेचे मोठे वैभव
आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रितम प्रकाश महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ढोबळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार एन. पगारिया, प्राचार्य सदाशिव कांबळे, मराठी विभागप्रमुख डॉ.विजय निकम आदी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. अशोककुमार पगारिया यांनी भाषा हे व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम असून भाव, भावना, विचार व्यक्त करण्यासाठी निसर्गाने मानवाला भाषेची फार मोठी देणगी दिली आहे. ही भाषा आपण जपली पाहिजे.व्यवहारामध्ये समाजामध्ये आपण आपल्या मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. त्यामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त होईल, साहित्यिकांच्या या विचारांचे पालन विद्यार्थ्यानी करावे असा सल्ला मा. डॉ.अशोककुमार एन. पगारिया यांनी दिला. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे काव्यवाचनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठी लोकसंस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या लावणीचे सादरीकरण कु.आकांक्षा शिंदे यांनी केले. प्रास्ताविक डॉ.विजय निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.विभा ब्राह्मणकर यांनी केले तर प्रा.सदाशिव कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ. हनुमंत शिंदे, प्रा. सुधाकर बैसाणे, प्रा.प्रवीण म्हस्के, प्रा.भास्कर पांडुरंग, डॉ.स्वाती वाघ, प्रा.उमेश लांडगे, राजेश कुंभार, महालक्ष्मी शिरसाट, प्रशांत रोकडे, सारिका बेलदोर, नीतू सिंग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. | |||
