Advertisement
सोलापूर : "कोल्हाट्याचं पोर" या कादंबरीचे लेखक दिवंगत डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांच्या आईची घरासाठीची वणवण थांबलेली नाही. सरकार दरबारी अनेक अर्ज केल्यानंतरही अद्याप घर मिळालं नसल्याची खंत शांताबाई काळे यांनी व्यक्त केली. गेल्या ४० वर्षांपासून लावणी कला जोपासणाऱ्या शांताबाई सध्या हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना आज घडीला निवृत्त कलावंत म्हणून दीड हजार रुपये इतकं तुटपुंज्या मानधनावर आणि डॉक्टर किशोर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी यावरच उदरनिर्वाह करावा लागत आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचीसुद्धा शांताबाई यांनी घराच्या बांधकामासंदर्भात भेट घेतली होती. अर्ज देऊन पाठपुरावाही केला. मुंबईत मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेही निवेदन दिलं होतं. नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनावेळी रहायला हक्काचं घर आणि वेळेवर मानधन मिळावं या मागणीचा पाठपुरावाही केला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींकडे निवेदन दिलं. शांताबाई यांना यावर कार्यवाहीचे आश्वासन मिळाले पण त्यावर प्रत्यक्षात कोणतीच कार्यवाही होऊ शकली नाही.
शांताबाई काळे यांनी खंत व्यक्त करताना म्हटलं की, माझा मुलगा जिवंत असता तर अशी भटकण्याची वेळ माझ्यावर आली नसती. ज्यांच्याकडे श्रीमंती आहे अशा लोकांना सरकार घर उपलब्ध करून देतंय. आमच्यासारख्या गरिबांकडे लक्ष द्यायला कोणी नाही.
किशोर काळे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर शांताबाई काळे यांच्यावर मोठा दु:खाचा डोंगरच कोसळला. त्यानंतर दयनीय अवस्थेत त्या आयुष्य जगत आहेत. स्वत:चं घर नाही, एका पत्र्याच्या खोलीत भाड्याने राहतात. निवृत्त कलावंत म्हणून मिळणाऱ्या मानधनातून त्या भाडं देतात. पण आता भाडं द्यायचं की पोटाला अन्न घ्यायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.