Advertisement
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची आता पुन्हा एकदा झीज सुरू झाल्याचं समोर आलंय. मूर्तीवर केलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया कुचकामी ठरली असून मूर्तीच्या सौदर्याला बांधा पोहोचली आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातली देवीची मूर्ती ही 2 हजार वर्षांपूर्वीची आहे अशी आख्यायिका आहे.
मूर्तीची झीज झाल्यानंतर पुरातत्व खाते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं 2015 साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काही होणार नाही असा दावाही करण्यात आला होता. पण त्यानंतर या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आणि रासायनिक थरही निघाले. देवीच्या मूर्तीच्या पायाचा भाग आणि गदेचे टोकही झिजल्याचं दिसून आलं. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच रासायनिक प्रक्रिया करण्यात आली होती. अनेक वेळा वज्रलेप केल्यानंतर मूर्तीच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले आहे. काही महिन्यांपूर्वी अचानक केलेला वज्रलेप वादात सापडला आहे. नवरात्रीमध्ये सवर्धन प्रक्रिया करून देखील 26 जानेवारीला देवीच्या डोळ्या शेजारील भागातील कपचा निघून पडला असून मूर्तीच्या चेहऱ्याच्या काही भागाला इजा पोहोचली आहे. प्रशासनाने मात्र तोंडावर बोट ठेवले आहे.
