Advertisement
नागपूर : भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर निवडणूक लढण्याचा प्रश्न असो किंवा निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा असो, तो भाजपने तो कधीच मोडलेला आहे. त्यामुळे पुण्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा काही प्रश्नच येणार नाही, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली.
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं 29 मार्चला निधन झाले. त्यानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार की नाही, कधी होणार, यावरुन चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, याच विषयावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, "अजित दादांचा म्हणणं बरोबर आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी माध्यमांनी मला प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरात मी म्हणालो की, महाविकास आघाडीने एकत्रितपणे ही निवडणूक लढवावी आणि उमेदवार सर्वानुमते ठरवावा. आतापर्यंत ज्या पक्षाकडे ती जागा होती. त्याच पक्षाने ती जागा लढवावी तसेच 100 टक्के ही जागा काँग्रेसकडेच राहील. मात्र राजकारण परिस्थितीप्रमाणे ठरत असते. उद्या निवडणूक जाहीर झाली तर महाविकास आघाडीने ती निवडणूक लढवावी आणि आपला उमेदवार निवडून आणावा. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सर्व निवडणुकांना सामोरे जात आहे. ज्याची जागा आहे, त्यांनी ती लढवावी असा आधीच ठरलेले आहे. पुढे काही नवीन फॉर्मुला ठरला, तर त्याप्रमाणे समोर जाऊ. मात्र, महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू आणि भाजपला नामोहरम करू, असेही वडेट्टीवार म्हणाले.
