Advertisement
औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजी नगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केलं आहे, पण औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमने विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी औरंगाबादप्रमाणेच महाराष्ट्रातल्या इतर शहरांची नावंही बदलण्याची मागणी केली आहे. 'कोल्हापूरचं नाव बदलून छत्रपती शाहू करावं, पुणाचे पुणे झाले, पुणेचा काय अर्थ आहे? महात्मा फुले, ज्योतिबा फुले यांचं नाव द्या. फुलेनगर नाव ठेवा, पुणेचे फुले करा. महान पुरुषांची नावं द्यायची असतील तर नागपूरला दीक्षा भूमी आहे, त्यामुळे नागपूरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. मुंबई मोठं शहर आहे, बॉम्बेचं मुंबई केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मुंबईला द्या. मालेगावचं नाव मौलाना आझाद करा,' अशी मागणी एमआयएमने केली आहे.
औरंगाबादचे आधीचे नाव खडकी होते, नाव बदलायचं होतं तर खडकी का नाही दिलं? बाळासाहेब आले त्यांना राजकारण करायचं होतं आणि त्यांनी संभाजी नगरची घोषणा केली, त्यानंतर मोठे राजकारण झालं. भाजपला सवाल आहे, बिहारचं औरंगाबाद कसं चालतं? महाराष्ट्राचं का चालत नाही? चालू अधिवेशनात, कोल्हापूर, पुणे आणि नागपूरचं नाव बदला आणि मोठ्या थोर नेत्यांची नाव द्या,' असं इम्तियाज जलिल म्हणाले आहेत.
