Advertisement
सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहर तसेच भीमा नदी काठावरील शहर आणि गावांसाठी असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी भीमा नदी पात्रात 3000 क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून ते 6000 क्युसेस करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
कालवा आणि पाणीवाटप मंडळाने ठरवलेल्या पूर्व नियोजनानुसार हे पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 1600 क्युसेस आणि सायंकाळी सहा वाजता धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून चौदाशे क्युसेस असं एकूण 3000 क्युसेसने भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.
उजनी धरण ते टाकळी बंधारा हे अंतर 232 किलोमीटरचे असून उजनी धरणातून सोडलेले पाणी टाकळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी नऊ ते दहा दिवस लागणार आहेत. नदीपात्रातून सोडलेल्या पाण्याचा उपयोग भीमा नदीच्या काठावरील शहरे आणि गावांसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी होणार आहे.
उजनी धरणासह जायकवाडी, गोसी खुर्द, गिरणा, मुळा आदी पाच प्रमुख धरणांतील गाळ काढण्यासाठी समितीमार्फत कामं सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. महाकाय अशा 123 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या धरणात 40 वर्षात साचलेली गाळमिश्रीत वाळू काढण्यात येणार असल्याने आता सोलापूरसह पुण्याचा देखील पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
