Advertisement
माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या सूचक विधानामुळे सोलापुरात चर्चा
मंगळवेढा : सोलापूर लोकसभेची पुढील वर्षी निवडणूक असून भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे विद्यमान खासदार आहेत. परंतु, जात प्रमाणपत्राचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना ते लोकसभेची निवडणूक लढवणार का? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेला भाजप स्थानिक उमेदवार देणार की उपरा याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केलेल्या विधानामुळे लोकसभेला भाजपचे उमेदवार लक्ष्मण ढोबळेच असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी माजी आमदार साळुंखे बोलत होते. या वेळी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, जकाराया शुगरचे बिराप्पा जाधव, उमेश पाटील, लतीफ तांबोळी, सुभदा शहा आदी उपस्थित होते.
मंगळवेढ्यात अनेक वर्ष आमदार आणि मंत्री म्हणून काम केलेले ढोबळे हे आपल्या भाषणात (स्व.) रतनचंद शहा यांनी आपल्याला आमदार केले, त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. असे नेहमी सांगतात. या कार्यक्रमात ढोबळेंनी प्रा. शिवाजीराव काळुंगे, दामाजीचे शिवानंद पाटील, जकारायाचे बिराप्पा जाधव यांच्यामुळे मंगळवेढ्यात चांगल्या पद्धतीची साखर निर्माण होऊ लागली. साखर धंद्यात आपल्याला विरोधक निर्माण होऊ नये, यासाठी ते काळजी घेतात, अशी टिपण्णी केली तसेच माजी नगराध्यक्षा अरूणा माळी, बॅंक चांगल्या पद्धतीने चालवणारे राहुल शहा यांचाही ढोबळे यांनी गौरव केला. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार दीपक साळुंखे म्हणाले की, लक्ष्मण ढोबळे भाजपमध्ये आहेत. असे आम्हाला वाटत नाही. ढोबळे यांच्या मनात काय चालू आहे, हे मलाही समजत नाही. काय चाललंय हे प्रशांत परिचारक आणि ढोबळेंनाच माहित.
दरम्यान, यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही व्यासपीठावरील सर्वांना दोन-दोन मिनिटे बोलण्याची मर्यादा दिली. मात्र, हा नियम माजी मंत्री ढोबळे यांना लागू नाही. परंतु, ढोबळे हल्ली ते शिस्तीच्या पक्षात असल्याने नियम पाळतात. पक्ष बैठकीत हात वर करावा लागतो, इतर पक्षासारखे नाही. होय म्हटले तर संधी असे सांगून ते शिस्त पाळतात, म्हटल्यावर आम्हीपण पाळतो, असा चिमटा साळुंखे यांनी काढला.
