Advertisement
सोलापूर : शिरूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार हे अद्याप ठरलेलं नाही, असं असतानाही राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या मतदारसंघातून पुन्हा निवडून येण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी देखील याच मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांकडून अप्रत्यक्षरित्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून नेमकं कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे हे चांगले उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत उत्तर कामगिरी केली आहे. त्यांनी बैलगाडा संदर्भात संसदेत केलेली भाषण गाजली आहेत. अमोल कोल्हे यांची संसदीय कार्यपद्धती उत्तम आहे. त्यांना अनेक प्रश्नांवर आवाज उठवल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
