Advertisement
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणच्या पथकाने यापूर्वीच दिला आहे पर्याय
सोलापूर : सोलापूर विमानतळ हे राजकीय कुरघोड्यांमुळे बंद पडल्याची ओरड होत असली तरी केंद्रात आणि जिल्ह्यात कॉंग्रेसची सत्ता असताना सुरवातीपासूनच या प्रकल्पावर योग्य पद्धतीने काम केले गेले नसल्याने पुढील प्रशासकीय कामांत हा प्रकल्प केवळ पुढे-पुढे ढकलत गेला. आता, या प्रकल्पात आजपर्यंत अडचणीचस ठरत असलेला एक-एक मुद्याचा गुंता भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या कळात सोडविण्याचे यशस्वी प्रयत्न असताना या विमानतळासाठी ज्यांनी भूसंपादन केले त्या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आता थेट भाजपलाच आव्हान देत "बघू किती दिवसांत सुरू करतात विमानसेवा', असे आव्हान दिले आहे. परंतु, यातून भाजप नव्हे तर शिंदे यांच्या कारकिर्दीत या प्रकल्पाबाबत झालेल्या कामांची चर्चा सुरू झाली आहे.सोलापुरात विमानसेवा सुरू होणे ही काळाची गरज ओळखून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केंद्रात सत्तेवर असताना जुन्या विमानतळाला भक्कम पर्याय म्हणून आहे. त्याच्या दूरदृष्टीकोनातून विचार करीत सोलापूरपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळाच्या उभारणीस केंद्राची मंजुरी मिळवून घेत, त्यानुसार सुमारे दोन हजार एकर जमिनीचे संपादनाचे मोठे काम केले. बोरामणी-तांदूळवाडी येथील या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमांकनाचे (डिमार्केशन) कामही वेगाने सुरू करण्यात आले होते, त्यावेळी 5 सव्रहेअर, नगरभूमापनचे 2 व इतर 15 कर्मचाऱ्यांचे पथकच कामाला लागले होते, त्यांच्याकडून संरक्षक भिंतीसह विमानतळाचे रेखांकनाचा अहवालही दिला गेला. परंतु, त्यानंतर कॉंग्रेसच्याच काळात तयार झालेला हा अहवाल अद्यापही लालफितीतच अडकला आहे. तेंव्हापासून विमानतळाच्या प्रकल्पात शासकीय, प्रशासकीय आणि राजकीय अडचणी येऊ लागल्या आहेत, त्या सोडविण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार यांनी त्यांच्या पातळीवर खूप प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये अपयश आल्याचे सध्याच्या विमातळाच्या स्थितीवरून तरी दिसत आहे.
सोलापुरात 2014 मध्ये सत्तांतर होऊन भाजपची सत्ता जिल्ह्यात आल्यानंतर विकासाच्या हालचाली सुरू झाल्या. केंद्रातही मोदी सरकार सत्तेवर असल्याकारणाने रेल्वे मंत्रालयाकडून सोलापूरपर्यंत "वंदे भारत' एक्सप्रेस सुरू झाली. तर, बोरामणी विमातळाचे फेरसर्वेक्षणाच्या सूचनाही नागरी विमान वाहतूक विभागाकडून दिल्या गेल्या. यानुसार भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या मुंबई कार्यालयातील पथकाने सोलापूर विमानतळसेवेत येणाऱ्या अडथळ्यांचे सर्वेक्षणही मागील वर्षी केले आहे. त्यानुसार सिद्धेश्वर साखर कारखाना परिसराचीही पाहणीही त्यांनी केली. त्यावेळी त्या पथकाने केलेल्या सूचनेनुसार होटगी रोड विमानतळाच्या जागेच्या मर्यादा लक्षात घेता, बोरामणी विमानतळाचा विकास होणे गरजेचे असल्याचे तसेच जोपर्यंत बोरामणी विमानतळ सुरू होत नाही तोपर्यंत उत्तर भारतातील सिमला, चंदीगड भागात ज्या प्रमाणे 27 आसनी हेलिकॉप्टरची सेवा सुरू आहे, तशी सेवा होटगी रोड विमानतळावरून सुरू करता येईल, असे स्पष्ट केले आहे. सोलापुरातून हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, शिर्डी, तिरूपती, गोवा या शहरांसाठी ही सेवा सुरू करता येऊ शकते, असेही पथकातील अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. परंतु, जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींना विमानतळच हवे आहे, ते सुरू होण्यास काही कालावधी नक्कीच लागेल. कारण, याची सुरूवात कॉंग्रेसच्या काळातच धिम्यागतीने झाली आहे, तुर्तास ज्यांना हवेत उडायची सवय आहे, त्यांनी हेलिकॉप्टरने उडावे, अशी चर्चा आता भाजपच्या राजकीय गोटात सुरू झाली आहे.
