Advertisement
- प्रा. लक्ष्मण ढोबळे, प्रांतिक कार्यकारीणी सदस्य, भाजपदेशात माय-लेकाचा पक्ष आहे. उत्तर भारतात बाप-लेकांचा पक्ष आहे. महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या पक्षाने जोर धरला आहे. तर, उत्तर भारतापासून अनेक राज्यात पक्षाचा सातबारा माझ्याच नावाचा असून सातबारावरचे अनेक पक्ष खानदानी ठेकेदार म्हणूनच मिरवताना दिसत आहेत. परंतु, कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष प्रथम राष्ट्रासाठी राबतो. त्यानंतर समाजासाठी राबतो. बीआरएस सारखे अवकाळी पक्ष ज्यावेळी भाजपवर आणि देशावर आघात करू पाहतात, त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते ते थोपवून धरतात. शेतकरी हिताखाली महाराष्ट्रात मटणावळीवर पक्ष बांधायला निघालेल्या बीआरएस च्या भुमिकेचे आता मतदारांनीच चिंतन करायला हवे असे वाटते.
......................
माणसाला सुळे दात नसतानाही तो मांसाहारी झाला हा संशोधनाचा विषय आहे. जो शाकाहारी पैलवान होता तो जगातला ताकदवान मल्ल म्हणून म्हणून ओळखला गेला. हे सर्वांनाच सर्वज्ञात आहे. अर्थात अख्ख भाजलेलं बोकड टेबलावर ठेवून चाकुने हवं तेवढं घेऊन बुफे सिस्टमने खाण्याचा अधिकार काही ठिकाणी सुळे दाताचे नेते गाजवत असतात आणि जर्मनी, जपान, अमेरिकेचे दौरे करत असतात. अलीकडे राज्याचं उद्योगाचे प्रतिनिधीत्व करताना अनेकवेळा परदेश दौरे करावे लागतात. सहवासातून, कधी संगतगुण, कधी सोबतगुण घडतो. त्यातून चव कळली की पांडुरंगाचा विसर पडतो आणि खाली मान घालून ताट रिकामे केले जाते, अशातूनच काल-परवा दर्शनाला येताना ताटाचं आकर्षित स्वरूप पाहिल्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांनी शाकाहारी, मांसाहारी यामधला कोणता हरी नाकारायचा त्यापेक्षा बीआरएस पक्षाचं धोरण म्हणून जेवणाचा पहिल्या कामाचा निपटारा पूर्ण करूया म्हणून मांसाहार घेतला असेल. खंडीचं खाणं मांडीच्या आड म्हणून अशा जेवणाला दुर्लक्ष करणे हेच हिताचे आहे. नोटांच्या गांधी दर्शनाने किंवा दत्तक पद्धतीच्या खर्चाचा बोजा उचलल्याने कार्यकर्ते प्रभावीत झाले असतील. कारण गाडी, निधी आणि कार्यालयीन खर्चाची व्यवस्था दत्तक पद्धतीने येत असेल तर एखाद्या शाकाहारी माणसाला देखील गांधी छाप दर्शनाचे आकर्षण वाटेल यात शंका नाही. त्याचबरोबर भरलेले ताट मोकळे सोडणे जीवावर आले म्हणूनच मांसाहाराची बातमी झाली. हे फारच अवघड आहे, अशावेळी ताट भरून उकडलेलं, भाजलेलं, शिजवलेलं आधाशासारखं खाताना फोटोग्राफरकडे, सेल्फी काढणाऱ्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. त्यामुळे मांसाहारी जेवणाची बातमी झाली.
आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी नको, असे सांगत मुस्लीम बांधवांनी दोन्ही धर्माचा मान राखला. परंतु, केसीआरजींच्या आगमनात दमलेल्या प्रवासाने थकलेल्या कार्यकर्त्यांना मांसाहारी जेवण देण्याबाबत आयोजकांनी व्यवस्था केली. तर, ताटात आलेले अन्न प्राशन करणे योग्य वाटले म्हणून कार्यकर्त्यांनी केसीआर पक्षाचे आदेश मानले. जर, हेलिकॉप्टरमधून फुले टाकली असती त्यामध्ये पु. लं.च्या भाषेत दारू दुकानाचे उद्घाटन करताना तिर्थप्रसाद म्हणून काय देणार, असा उल्लेख साहित्यिक भाषेत केला होता. कदाचित पुष्पवृष्टी करताना हाताचा आणि तोंडाचा कोणता वास येईल, याची काळजी घेतली पाहिजे. यावर पुष्पवृष्टीने मोठेपण अवलंबून आहे. पोलीस प्रशासनाने पुष्पवृष्टीचा कार्यक्रम नाकारला. हे एका दृष्टीने चांगले झाले.
