Advertisement
ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांची मागणी; २०२१ पासून करीत आहेत पाठपुरावा
पुणे : राज्यभरात अद्यापही काही नियमबाह्य टोलनाके सुरू आहेत. टोळगुंड असे नाके चालवत आहेत. त्यामुळे सर्वच टोलनाके व टोल कर्मचाऱ्यांसाठी राज्यभरात एकच योग्य ती नियमावली जाहीर करण्याची मागणी बहुजन रयत परिषदेच्या ॲड. कोमलताई साळुंखे - ढोबळे यांनी शासनाकडे डिसेंबर २०२१ मध्ये केली होती. तेव्हापासून त्या याबाबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु, टोळधाड ठेकेदारांकडून यास विरोध होत असल्याने अशी नियमावली करण्याकडे शासन अद्यापही दुर्लक्ष करीत आहे का? असा सवाल करीत, याबाबतचे स्मरणपत्र राज्य शासनास पुन्हा देणार आहे, असे ॲड. कोमलताई यांनी सांगितले.
नाशिक येथील सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर मनसेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांची गाडी अडवून त्यांना टोलनाका कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. यापूर्वी असाच प्रकार नाशिक महामार्गावर आळेफाटा टोलनाक्यावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या, बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. कोमलताई यांच्याबाबत २०२१ मध्ये घडला होता. त्यांची गाडी अडवून अपमानास्पद वागणूक तसेच शिवराळ भाषा वापरण्यात आली होती. यातून सामान्य नागरिकांना असाच त्रास या टोलनाक्यावर सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्याने हा टोलनाका फोडण्यासाठी राज्यभरातून
बहुजन रयत परिषदेचे कार्यकर्ते आले होते. त्यावेळी ॲड.कोमलताई यांनी संयमाची भूमिका घेत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते, सदर टोलनाका ठेकेदारा विरोधात पोलिसांत तक्रार केली होती तसेच राज्यभरातून जिल्हाधिकारी यांना सदर टोलनाका बंद करण्याबाबत बहुजन रयत परिषदेच्या वतीने निवेदने दिली गेली होती. त्यानंतर अॅड. कोमलताई यांची टोलवाल्यांनी माफी मागितली होती. परंतु, मला माफी नको तर सर्व सामान्य नागरिकांची टोलनाक्यावर होणारी लूट, महिला प्रवासी चालक असल्यास दिली जाणारी वागणूक, शिवराळ भाषा, फास्ट ट्रॅक बाबतचे अघोषित नियम आदीबाबी लक्षात घेता सर्व टोलनाक्यासाठी एकच योग्य नियमावली करावी, अशी भूमिका ॲड. कोमलताई यांनी २०२१ मध्येच घेतली होती. परंतु, याकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने टोलनाक्यावरील गैरप्रकार असेच सुरू आहेत. सिन्नर येथे झालेला प्रकार यातूनच घडला आहे. २०२१ मध्ये बहुजन परिषदेनेही अशीच भूमिका घ्यायला हवी होती का? असा प्रश्न उपस्थित करून टोल नाक्यावरील टोळगुंड हटवून आतातरी योग्य नियमावली करावी, नियंत्रणासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी नेमावेत अशी मागणीही ॲड. कोमलताई यांनी केली आहे.
