Advertisement
पुणे : देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात असल्यामुळे राज्य सरकारने मागील वर्षी मोठा निर्णय घेतला होता. राज्यात75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता प्रक्रियेत पोलीस भरती अन् जिल्हा परिषद भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. परंतु या भरतीच्या माध्यमातून किती परीक्षा शुल्क जमा होणार आहे, यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट केले आहे.
राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा सुमारे 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. राज्यात असलेल्या कर्मचारी संख्येच्या तुलनेत रिक्त असलेल्या पदांची संख्या 23 टक्के आहेत. यामुळे राज्यातील विविध विभागांत 75 हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या भरतीसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. आता राज्यातील जिल्हा परिषदेत 19 हजारापेक्षा जास्त जागांची भरती होणार आहे. ही भरती इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून होत आहे. त्यासाठी खासगी कंपनीला कॉन्ट्रक्ट दिले गेले आहे.
रोहित पवार यांनी मांडले गणित
भरतीसंदर्भात आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग करुन ट्विट केले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, राज्यात 75 हजार पदांची भरती होणार आहे. भरतीसाठी एका जागेस 200 विद्यार्थी अर्ज करतील, म्हणजेच जवळपास दीड कोटी अर्ज येतील. दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी परीक्षाफी आहे तब्बल 1500 कोटी रुपये असणार आहे. MPSC चे वार्षिक बजेट आहे 60 कोटी रुपये आहे. परंतु खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत 1500 कोटी रुपये. हा विषय अतिशय गंभीर आहे. 1500 कोटींची वसुली का होत आहे? एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील का? परीक्षा चांगल्या होण्याची हमी आहे का ?
