Advertisement
नागपूर : मुख्यमंत्री असतात तेव्हा दोन पैकी एक उपमुख्यमंत्री नसतो. दोन उपमुख्यमंत्री असतात तेव्हा मुख्यमंत्री नसतात. मुख्यमंत्र्यांनी भोजनाचं आवतन दिलं त्याला एक उपमुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. यावरून राज्यात सर्व काही अलबेल सुरू आहे असं म्हणता येत नाही. सप्टेंबर महिन्यातच राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार आहे. मी ठासून सांगतो राज्यात बदल होणार आहेच, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाट्टेल ते महाराष्ट्रात चाललं आहे. राज्यात काहीच अलबेल नाहीये. येणाऱ्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात मोठे बदल होतील. राज्यातील जनता हे बदल पाहील. राज्यात मुख्य खुर्ची पासून बदलला सुरुवात होईल. मी खात्रीने सांगतो. सप्टेंबरमध्ये पूर्ण सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं मी म्हणत नाही. पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल. हे ठासून सांगतो, असा मोठा दावाच विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
