Advertisement
नवी दिल्ली : कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित प्रकरणात मलिक यांना अटक झाली होती. दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते. या कारणावरुन नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. तब्बल एका वर्षानंतर त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना जामीन मिळाला आहे.
काय आहे आजार
नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. मलिक हे आजारी असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात पटवून दिले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ दिला. यामुळे मलिक जामीनासाठी पात्र असल्याचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज मंजूर करत वैद्यकीय कारणासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला.
