Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या कांदिवली, चारकोप, मालाडमधील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून आपला राजीनामा पाठवला आहे. या पदाधिकाऱ्यांनी पत्रात आपली नाराजी मांडली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. ‘सिद्धेश कदम यांच्याकडून पक्षात काम करु दिले जात नाही’, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पदाधिकाऱ्यांची संख्या ही तब्बल 30 ते 40 इतकी आहे. “आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण कदमांना समज द्या”, असं पदाधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
