Advertisement
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या हिंसेवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले होते. मणिपूरमध्ये तुम्ही भारतमातेची हत्या केली आहे. भारत एक आवाज आहे. भारत आपल्या जनतेची आवाज आहे. हृदयातून येणारी आवाज आहे. त्या आवाजाची हत्या मणिपूरमध्ये करण्यात आली आहे. याचा अर्थ तुम्ही भारत मातेची हत्या मणिपूरमध्ये केली आहे. तुम्ही मणिपूरमध्ये लोकांना मारून भारतमातेची हत्या केली आहे. तुम्ही देशद्रोही आहात. तुम्ही देशप्रेमी नाही. त्यामुळेच तुम्ही मणिपूरला जात नाही. कारण हिंदुस्थानची हत्या केली आहे. भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही भारतमातेचे संरक्षक नाहीत. तुम्ही तर भारत मातेचे हत्यारे आहात, असा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी बोलत असताना लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी त्यांना मध्येच थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आदराने बोला असं ओम बिरला वारंवार सांगत होते. त्यावेळी सभागृहात एकच गोंधळ झाला.
