Advertisement
भोपाळ : इंडिया आघाडी समन्वय समितीची नवी दिल्लीत नुकतीच बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर समन्वय समितीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी महत्त्वाची माहिती दिली होती. इंडिया आघाडीत आता जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. तसेच लवकरच इंडिया आघाडीच्या देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित सभा पार पडणार, असं वेणुगोपाल यांनी सांगितलं.
इंडिया आघाडीची पहिली सभा मध्य प्रदेशच्या भोपाळ या शहरात आयोजित करण्यात आलीय. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सभा होईल, अशी माहिती के सी वेणुगोपाल यांनी दिली होती. पण वेणुगोपाल यांनी इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेची घोषणा केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. इंडिया आघाडीची भोपाळमधील सभा रद्द झालीय, असं त्यांनी सांगितलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने केंद्रीय नेतृत्वासमोर सभा आयोजित करण्यात असमर्थता दर्शवल्याची चर्चा आहे.