Advertisement
जालना : मराठा आरक्षणाचं आंदोलन अधिक तीव्र होत असताना सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्याआधीचा एक व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील संभाषणावर टीका केली जात आहे. या संभाषणावर आक्षेप घेत नेटकऱ्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच विरोधी पक्षातील नेत्यांनीही यावर जोरदार टीका केली आहे. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सारवासारव केली आहे.
जालन्यात बोलताना त्यांनी आपली बाजू मांडली आहे. परवा जी पत्रकार परिषद झाली. त्यातला मागचा पुढचा भाग काढला आणि मधला तेवढाच व्हीडिओ दाखवला. आमचा माध्यमांवर विश्वास आहे. हा तर विश्वासघात झाला. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत येत होतो. आमची बैठक ही साडेबारा एकपर्यंत ही बैठक चालली. त्या बैठकीनंतर आम्ही पत्रकार परिषदेला येत होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उत्तरं नको. मीही म्हणालो, प्रश्न उत्तरं नको आणि राजकीय वक्तव्यही नको. फक्त बैठकीत जे ठरलं आहे तितकंच बोलायचं आणि निघायचं, असं मी बोललो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.