Advertisement
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचा सवाल
पुणे : राज्यातील मराठा आरक्षण, जालना येथे आंदोलकांवर झालेला लाठीमार, मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण, वंशावळीत कुणबी उल्लेख असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा राज्य शासनाने काढलेला अध्यादेश (जीआर) याशिवाय राज्यातील पावसाचे प्रमाण घटल्याने अडचणीत आलेला शेतकरी, शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या असे मुद्दे गाजत असताना भारतीय राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे संस्थापक अर्थात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव राज्यात फिरकलेही नाहीत, शेतकऱ्यांच्या मुद्यावर महाराष्ट्राचा दौरा करून "बीआरएस'ने राजकीय आव्हान देण्याची तयारी केली होती. आता, के. राव गेले कोठे? असा थेट सवाल बहुजन रयत परिषदेच्या ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केला आहे.बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना "बीआरएस' मधून निवडणूक लढविणार का? असा प्रश्न केला असता त्यांनी सदर स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या की, मी ज्या परिषदेची प्रदेशाध्यक्षा आहे ती कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षा पेक्षा कमी नाही. बीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव सोलापुरात आले त्यावेळी त्यांचे केवळ स्वागत केले होते. त्यावेळीही मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. आदरणीय प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे प्रांतीय सदस्य म्हणून कार्यरत होते तसेच बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत आहोत. निवडणुकीचे वातावरण तयार झाल्यानेच बीआरएस राज्यात हातपाय पसरत असल्याचे माहित होते. हा पक्ष तेलंगणातील प्रश्न सोडवू शकत असला तरी महाराष्ट्रातील प्रश्न सोडवू शकेलच असे नाही, हे मी यापूर्वीही स्पष्ट केले आहे.
सध्याचे मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या तसेच राज्यात पडलेला दुष्काळ या प्रश्नावर "बीआरएस'चे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव कणखर भूमिका घेतील, यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाशी चर्चा करीत किंबहुना मराठा आंदोलनकर्त्यांच्या भेटीला तरी येतील, अशी आशा राज्यभरातील "बीआरएस'च्या नवख्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना होती. परंतु, सध्या बीआरएस आणि या पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून गायब झाल्याचे स्थिती आहे. या पक्षाला महाराष्ट्रात जर खरोखरच विस्तार करायचा असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील प्रश्न जाणून घ्यावेत. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा जाणत्या नेत्यांनी मराठा आरक्षण तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम केलेले असतानाही त्यांना या समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते त्यात बीआरएस आणि के. चंद्रशेखर राव यांना ही स्थिती हाताळणे कठीणच आहे. त्यांनी राज्यात शक्ती प्रदर्शनाच्या दौऱ्यासाठी नव्हे तर जनेतेचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी यावे, असे थेट आमंत्रण बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिले आहे.
