Advertisement
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश निवडणुकांच्या निकालांचा फटका महाराष्ट्र काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत काँग्रेसची ताकद घटलीय तर राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची चिन्हं आहेत.
या निकालानंतर राज्यात लोकसभेसाठीच्या जागावाटपात काँग्रेसचा वाटा कमी झाल्यानं विशेषत राष्ट्रवादी पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट काँग्रेसला जास्त जागा सोडण्याच्या तयारीत नाहीत. 44 जागांसाठी मविआची बोलणी पूर्ण झालीयेत.. यात ठाकरे गटाला 19 ते 21, काँग्रेसला13 ते 15 तर शरद पवार गटाला 10 ते 15 जागा मिळू शकतात. 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. मात्र आता जागावाटपाची ही समीकरणं बदलू शकतात, काँग्रेसच्या पदरात कमी जागा पडू शकतात. फक्त जागावाटपातच काँग्रेसला हादरा बसणार नाही तर 3 राज्यांच्या निकालांमुळे काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे हा गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहे.
