Advertisement
पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे. निर्यातबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. नाशिक, पुणे, सोलापूर बाजार समित्यांमध्ये पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचे दर चार हजारांवर पोहचले होते. आता ते निम्म्यावर आले आहेत. यामुळे शेतकरी संतप्त झाले असून अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत आहेत. आता कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार राज्यातील आणखी दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.
केंद्र सरकार कांदा नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफ यांनी आतापर्यंत पाच लाख मॅट्रिक कांदा खरेदी केला आहे. अजून दोन लाख टन कांदा खरेदी करुन घसरत असलेले दर रोखण्याचा उपाय सरकार करणार आहे. या दोन्ही संस्थांनी 25 रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी सुरू केली आहे. एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस चंद्र यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात होणारी घसरण रोखण्यास मदत होणार आहे.
