Advertisement
मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह 'मशाल' अडचणीत आले आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिले असून त्यावर आता एका राजकीय पक्षाने दावा केला आहे. आपले मशाल चिन्ह परत मिळावे अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली असून त्यासाठी सर्व कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत.
एकनाथ शिंदे यांचा गट हाच खरी शिवसेना हे स्पष्ट झाल्याने ठाकरे यांना मोठा हादरा बसला आहे. निवडणूक आयोगाने आधीच शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याने शिवसेनेवर मोठे संकट असतानाच आता उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल या निवडणूक चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकात मशाल चिन्हावर निवडणूक लढविण्यात अडचणी येणार असल्याचे म्हटले जात आहे. समता पार्टीने ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह आमच्या पक्षांचे असून आमची एक राष्ट्रीय पार्टी आहे. बिहार मणिपूर आणि इतर ठिकाणी निवडणुकीत आम्ही मशाल चिन्हावरच निवडणूक लढलो आहोत. आता लोकसभा निवडणुकांआधी निवडणूक आयोगाने सर्वच राष्ट्रीय पक्षांना चिन्हासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केली असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या ‘मशाल’ चिन्हाचा दावा करणार असल्याचे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे.
