Advertisement
परभणी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. आपल्याला मोठ्या ऑफर येत आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं. भाजपकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली जात असल्याच्या मुद्द्यावर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया परभणीत दिली. मला थेट नाही मात्र मध्यस्थाकडून मी केंद्रीय मंत्र्यांना भेटावं त्यांच्याकडून काम करून घ्यावीत. त्यांच्याशी जवळीक साधावी अशा प्रकारचे निरोप मला येत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाण्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. प्रत्यक्ष माझ्याबरोबर कोणी अशी चर्चा केलेली नाही. अप्रत्यक्षपणे येऊन काही लोक दिल्लीला भेटण्याचा आग्रह करतात. आम्हाला यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. जरी भाजपकडून अप्रत्यक्षपणे विचारणा होत असली तर आपण हुरळून जाणार नाही. आमच्या कार्यकारिणींने निर्णय घेतलेला आहे. आम्ही ना भाजप सोबत जाणार, ना महाविकास आघाडी सोबत जाणार. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीकडून काही ठिकाणी जागा सुटलाच्या चर्चा होतात. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही फक्त शेतकरी चळवळीसाठीच काम करणार आहोत. आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे.
