Advertisement
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोलापुरातून लोकसभेचे रणशिंघ फुंकले. तसेच सोलापूरमधील लक्षणिय मतदार असलेल्या पद्मशाली आणि विश्वकर्मा या दोन समाजांचा जाणीवपूर्वक उल्लेख करीत या मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आठवडाभरानंतर दुसऱ्यांदा आलेले पंतप्रधान मोदी यांनी सोलापूरच्या जाहीर सभेत ‘मोदी की गॅरंटी’ या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या घोषणेचा सातत्याने उल्लेख करीत मतदारांना आपल्याला पुन्हा निवडून देण्याची भावनिक साद घातली. सोलापूरमधील लक्षणिय मतदार असलेल्या पद्मशाली आणि विश्वकर्मा या दोन समाजांचा जाणीवपूर्वक उल्लेख करीत या मतदारांना आपलेसे केले.
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा या दोन्ही लोकसभेच्या जागा सध्या भाजपकडे आहेत. याशिवाय आसपासच्या लातूर, धाराशिव या मतदारसंघांवर प्रभाव पाडण्यासाठी मोदी यांच्या सभेचा वापर भाजपने पद्धतशीरपणे केला. येथील घरांच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी यांनी सोलापूरकरांना साद घातली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोदी यांनी प्रत्येक सभेत ‘मोदी की गॅरंटी’चा सतत उल्लेख केला होता. याच पार्श्वभूमीवर आज सोलापूरात भाजपच्या प्रचाराची सुरुवात मोदी यांनी केली.
सोलापूरमधील सभेत गरिबांची धरे, गरिबी हटविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायांची माहिती देतानाच मोदी यांनी मुद्दामहून ‘मोदी की गॅरंटी’चा उल्लेख केला. गेली दहा वर्षे गोरगरीबांचा आमच्या सरकारने सेवा केली. त्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पुढील पाच वर्षे गरिबांना मोफत धान्य देण्याची ग्वाही सरकारने दिली आहे. गरीब, शेतकरी, कामगार, दुर्बल घटकांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. आमच्या सरकारवर पुन्हा विश्वास दाखवावा, असे आवाहन करीत मोदी यांनी आगामी निवडणुकीत भाजपला मतदान करावे, असे सूचित केले.
सोलापूरमध्ये पद्मशाली आणि विश्वकर्मा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन्ही समाजांचा गौरव करीत त्यांना आपलेसे केले. यासाठी सोलापूर आणि अहमदाबादचे कसे भावनिक नाते याचा दाखला दिला.
