Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात इंडिया आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा फॉर्म्युला तयार असल्याचं बोललं जात आहे. या फॉर्म्युलाअंतर्गत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची रणनिती ठरवण्यात आली आहे. महाराष्ट्रात इंडिया आघाडीतून चार पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब गट) आणि वंचित बहुजन आघाडी हे चार पक्ष इंडिया आघाडीतर्फे मैदानात असणार आहेत. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष 20 जागांवर निवडणूक लढवू शकतो. तर शिवसेनेलाही (उद्धव बाळासाहेब गट) 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सहा जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर वंचित बहुजन आघाडीला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या हिंदू राष्ट्रवादाला काऊंटर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला इंडिया आघाडीत बरोबरच स्थान दिलं जाणार आहे. फुटीनंतरही शिवसैनिकांचं उद्धव ठाकरेंना समर्थन असल्याचं मानलं जातंय. अजीत पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाजूला झाल्यानंतर शरद पवार गटात जास्त आमदार उरलेले नाहीत. त्यामुळे शरद पवार गटाला कमी जागा देण्यावर मनवलं जाईल. दलित मतं मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पार्टीलाही जागा दिल्या जातील.
