Advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला फसवल्याचे प्रकरण मागील 2012 पासून गाजत आहे. या प्रकरणी 2020 मध्ये, मुंबई पोलिसांनी सर्व संबंधितांना ‘क्लीन चिट’ दिली. मात्र, या निर्णयाला ईडीने न्यायालयात याचिका दाखल करत विरोध केला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना हा आजारी कारखाना असून या कारखान्याची खरेदी करण्यासाठी दुसऱ्या एका कंपनीला बारामती ऍग्रोने ‘कॅश क्रेडिट अकाउंट’मधून 5 कोटींची रक्कम देऊन बोली लावण्यास सांगितल्याचा दावा ईडीने केला आहे. मात्र जी रक्कम वापरुन ही बोली लावण्यास सांगण्यात आलं ती रक्कम वास्तविकपणे बारामती ऍग्रोला खेळते भांडवल म्हणून कर्ज रुपाने मंजूर करण्यात आली होती. या खरेदी प्रकरणामध्ये बारामती ऍग्रो कंपनीने कर्जापोटी मिळालेली रक्कम दुसऱ्याच कारणासाठी वापरल्याचा, ईडीचा दावा आहे. ईडीच्या या संपूर्ण दाव्याचा इशारा बारामती ऍग्रोचे कार्यकारी व्यवस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे आहे. वरिष्ठ व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरील गैरप्रकार होणं शक्य नाही, असा ईडीचा दावा आहे.
